कविता ...!
अजूनही काव्य ,
भावनांच्या गुंत्यात गुंतलेय ....
आजच्या युगात ,
प्रेमाच्या जाळ्यात फसलेय ....
हळवी कविता,
वर्तमानात कधी येणार ?
भावविवश होऊन ,
सद्यस्थिती कधी साहणार ?
भ्रष्टाचारास पाहुनि ,
आसूड शब्दांचे कधी ओढणार ?
अबलांवरील अन्यायास ,
पाहुनी त्वेषाने कधी पेटणार ?
गरज आहे काळाची ,
कवितेस काल्पनिक विश्वातून जागण्याची
बदलून दृष्टी कवितेची ,
बोलातून समस्या सामाजिक मांडण्याची
रात्रीच्या मोहमयी स्वप्नातून ,
जागून सूर्यकिरणे सत्याची पाहण्याची
नाजूक भावूक कामूक,
कवितेस ठाऊक पाऊलवाट फुलांची ,
पिडीत कष्टीत व्यथित ,
जनांच्या काटेरी महामार्गावरून चालण्याची ...!
संध्या उदयन जोशी ह्या माझ्या एका मैत्रिणीच्या
कवितेवरून हि कविता मी शब्दबद्ध केली आहे !
कवितेवरून हि कविता मी शब्दबद्ध केली आहे !
---संजय कुलकर्णी
No comments:
Post a Comment